Tuesday 19 May 2020

My Pranam at the lotus feet of Swami Tejomayanand ji. 19/05/2020

Pranam Guruji,

Everyday, listening to your discourse on the Kathopnishad is like trying to digest at least one drop of अमृत तुल्य ज्ञान which makes my life better in every sense. The warmth & affection in your voice makes understanding so much easy and interesting. Praying HIM to keep me blessed with your guiding words always. 

Guruji, as you mentioned correctly in your discourse yesterday, the Guru's teachings truly churn / ignites few thoughts / questions in student's mind. I, too, get so many thoughts after listening to you. Instead of keeping them locked inside my mind or heart, I have decided to express them and surrender them at your lotus feet. Guruji, please bless me and accept my humble offering. 

19/05/2020
Super cyclone Amphan has intensified. Learnt from the IMD. Millions of people in India and Bangladesh are in the path of a super cyclone which is due to make landfall in less than 36 hours, bringing damaging winds and heavy rain to a region already struggling with the coronavirus pandemic. 

The wind is blowing strong. It's cloudy in Bangalore. Surprisingly, the wind is cool and has brought the relief from heat. Sitting in balcony & sipping the tea was such a great experience. The cool breeze and hot tea...what a unique combination. On one hand, this intensified cyclone is bringing destruction in one part of the earth and on the other side, it's sending cool breeze. Isn't it an irony? The destructive power of nature is being unfolded. We all will come to know about this havoc in a short while. Praying Goddess Nature to lessen HER anger over mankind.

The thought occurred to my mind - 

When the angry power of nature intensifies, it destructs everything in it's path. It churns the negativity and disturbs the calmness, peace on the earth. It's creates uneasiness in our minds. 

Whereas, when our urge to auquire the knowledge about our "Param Atman" intensifies, it makes us more calm and we are at peace with ourselves. The more the intensity of "Sat Chit Anand" , the more calmness in our heart & mind. The more we will be "One" with ourselves. This intensified gyan will bring not only happiness , peace , calmness but also meaning to our life. 

For both these developments, the same force in the cosmos is responsible. But, the results are exactly opposite. Isn't it a beauty of the creation? 

My mind is still pondering over this thought. 

May God give all the strength & wisdom to all the people, who will be affected by this process.

Hari OM. 🙏



Wednesday 14 May 2014

चिमुकली लेक

चिमुकली लेक

श्री.गजानन महाराजांचे चरित्र वाचून झाल्यावर रात्री सुखासमाधानाने झोप लागली नसती तरच जरा विचित्र वाटले असते. संत , महापुरुष ह्यांच्या चरित्रात अशी काय जादू असते कुणास ठावूक कि ते वाचून झाल्यावर मन अगदी शांत आणि निश्चिंत होवून जाते . आई  वडिलांना त्यांच्या स्वतःच्या प्राणापलीकडे सुद्धा  प्रिय असलेल्या त्या गर्भातल्या चिमुकल्या जीवाला सुद्धा ह्या सुखासमाधानाचा मागोवा नक्किच लागला असावा. म्हणूनच अगदी लगबगीने बाहेरच्या  सुंदर दुनियेचा स्वाद घेण्यासाठी त्या जीवाने दुसऱ्याच दिवशी सकाळच्या कोवळ्या प्रहरी आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात प्रवेश केला. अगदी पहिल्या क्षणापासून ह्या बाळाने जे सुंदर हास्य द्यायला सुरवात केली ते  अजूनही असेच सुंदर , मोहक , खळखळून हसत आहे . तिचे हे मनाला वेड करून टाकणारे हास्य असेच कायम राहू देत हीच देवाकडे प्रार्थना !!

बालपणी नानाप्रकारच्या बालक्रीडा करून पालकांच्या
आणि आजूबाजूंच्या लोकांच्या मनात घर करून राहणारी हि लेक स्वभावाने थोडीशी हट्टी आहे. परंतु मुळाशी मनाने गोड हळवी असल्याने तिचा हट्टीपणा सुद्धा हवाहवासा वाटणारा आहे. नेहमी हसतखेळत असणाऱ्या ह्या लेकीने घराचं जणूकाही नंदनवन बनवून टाकले होते. शाळेत अभ्यासात एकदम उत्तम गुण  मिळवणारी , भाषण-नृत्य- खेळ अशा अनेक गोष्टीत भरपूर बक्षिशे मिळवणारी, कॉलेजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येवून चांदीचे पदक घेवून घराण्याचे नाव उज्ज्वल करणारी, ऑफिसमध्ये 'Best employee ' म्हणून सत्कार करून घेणारी, घरी कुठल्याही प्रकारच्या कामाला सदैव तयार असणारी, स्वताच्या कर्तुत्वाने मुलानासुद्धा लाजवणारी ....अशी ही चिमुकली पोर कधी लग्नाच्या बोहल्यावर उभी राहिली हे कळलेच नाही. लग्नातला तिचा सतत हसतमुख असलेला चेहरा किती वेळा डोळ्यासमोर आणला तरी मनाचे समाधान होत नाही. स्वताच्या पसंतीचा जीवनसाथी निवडून,लग्नानंतर एकाच गावात राहणार असल्यामुळे विदायीच्या वेळी आईच्या डोळ्यात अश्रू न येणे ह्यात चुकीचे असे काहीच नव्हते. ह्याच्या उलट, संस्काराने आमच्यापेक्षा वरचढ असलेल्या कुटुंबात ती जात होती म्हणून मनाला हायसे वाटले होते. माहेरच्या लोकांची तिला उणीव अजिबात भासणार नाही ह्याची अगदी खात्री होती. एका  मायेने    ह्याच्यापेक्षा आणखीन काय बरे देवाकडे मागितले असते?

लेक सासरी सुखाने नांदत आहे ह्या सुखाच्या विश्वात मन असे काही रंगून गेले होते कि लेकीच्या कुंडलीत परदेशी स्थलांतराचा  योग येणार आहे ह्याचा काही काळ का  होईना विसर पडून गेला होता. थोड्याच दिवसात हि पोर दूरच्या देशात स्वताची स्वप्ने साकार करण्यासाठी उमेदीच्या पंखावर  बसून आमच्यापासून अलग होणार ह्याची जाणीव झाली आणि डोळे पाणावले. लग्नमंडपात न आलेल्या हुंद्क्याने अचानक स्वताच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. लेकीच्या विरहाच्या कल्पनेने मन व्याकूळ झाले. कडक शिस्तीच्या नावाखाली,  तिच्या बालपणात तिच्या चिमुकल्या गोंडस  कोमल हाताच्या  तळव्यावर गरम चमच्याने दिलेला चटका आणि स्पर्धेत गाणे न म्हणता गुपचूप उभी राहिली म्हणून खोलीत हाताची घडी करून चार तास कोपऱ्यात उभे राहण्याची दिलेली शिक्षा ... ह्या अपराधांच्या बोज्याखाली तिचीl माय आजही दबून गेली आहे. काय प्रायच्शित्त करावे म्हणजे ह्याची खंत मनातून कायमची विलोप होवून जाईल? वयाची २८ वर्षे झाली तरी स्वताच बालमन जसच्या तसं जपून ठेवलेली हि लेक तिच्या आईला कधी तरी प्रेमाच्या खातीर क्षमा करेल ना ?

Sunday 4 May 2014

संकोच

संकोच

नववधू लेकीच्या घरात तिचे सासूसासरे सहा महिन्यासाठी अमेरिकेला त्यांच्या लेकीकडे राहावयास जाणार आहेत. लेकीला सुचवले कि , "तुम्ही दोघेच एकटे राहण्यापेक्षा माहेरी येवून राहिलात तर बरे होईल ." लेकीने झटकन उत्तर दिले . म्हणाली ,"नको . आम्ही आमच्याच घरात राहू . माझ्या नवऱ्याला माझ्या माहेरी येवून राहावयास संकोच वाटतो . " तिचे हे समझदार पणाचे उत्तर ऐकून एकीकडे बरे वाटले तर दुसरीकडे मनात विचार आला ...लेक विवाह करून अगदी अपरिचित ,अनोळख्या घरी फक्त एका व्यक्तीवर प्रेमपूर्वक विश्वास ठेवून पदार्पण करते आणि अगदी दुसऱ्या क्षणापासूनच कुठल्याही प्रकारचा संकोच न करता त्या घरातील प्रत्येक माणसाला , प्रत्येक वस्तूला ,त्या घराला आपलेसे मानून प्रेम करायला सुरवात करते. तिला कसा नाही संकोच वाटत नवीन घरी? कुठल्या गोष्टीवर एव्हढा खात्रीपूर्वक विश्वास ठेवून ती त्या नवीन वातावरणात रमून जाते आणि आपल्या पुढील आयुष्यातील स्वप्ने रंगवू लागते? चारच वर्षापूर्वी ' लग्न ' या शब्दाबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न आणि शंका असलेल्या माझ्या लेकीने स्वतःच्या संसाराची सुरवात मुलायम प्रेमाने सुरु केलेला पाहून मनाला बरे वाटले आणि देवाचे मनापासून आभार मानले.

Wednesday 30 April 2014

भोळेपणा कि भोळसटपणा

भोळेपणा कि भोळसटपणा

स्थळ : महाराजा भोग उपहारगृह
वेळ : रात्री ९ वाजता
मेनू : राजस्थानी शाकाहारी थाळी

कचकचुन लागलेली भूक, समोर बसलेली सुंदर हसमुख अशी व्यक्ती - माझा नवरा , ताटात असलेल्या अनेक वाट्या कडे पाहत असतांना लक्षात आले कि समोरच्या टेबलावर बसलेला १०-१२ वर्षाचा मुलगा हात जोडून  डोळे  मिटुन मंत्र म्हणत होता. चकित होवून त्याचाकडे पाहत असतांना त्याच्या पालकांचे कौतुक करावसे वाटले. मनात शंकेची पाल चुकचुकली ..... हा मुलगा पुढे मोठा झाल्यानंतर असाच राहील का ? खरच , लहानपणी रुजू घातलेले संस्कार तसेच राहत का नाहीत? तारुण्यावस्थेत असे काय होते कि माणसात एकदम बदल घडून येतो आणि बालपणातील कोवळे आणि निरागस मन अचानक नकळत हरवून बसतो ?

Tuesday 12 November 2013

दोन मुंग्या
 


 
आलं घालून मस्त पैकी उकळवलेला दुपारचा चहा पीता पीता समोरच्या भिंतीवर लक्ष गेले. दोन मुंग्या , एक अंगाने स्थूल आणि तर  दुसरी एकदम नाजूक, हातात हात घालून त्या  भल्या मोठ्या  भिंतीवर तुरुतुरु चालल्या होत्या. जणू काही अगदी पार छता पर्यंत जावून पोहचण्याचा त्यांचा इरादा असावा असे भासले. काय ठरवून त्या वर चढत होत्या ह्याची देवालासुद्धा कल्पना नसावी. जोडी जोडी ने चालण्याच्या त्यांच्या त्या बेमालून लकबी कडे पाहिल्यावर मला वाटले कि दोन जीवनसाथीच मनात कुठलीतरी आशा ठेवून चढत आहेत. खरंच आयुष्यात सर्व प्रकारच्या वळणावर कुणीतरी साथीदार बरोबर असल्यावर रणरणत्या  उन्हात सुद्धा गोड, स्वच्छ, मृदुल, थंड चांदण्याचा भास होतो आणि असे वाटते कि हा प्रवास कधी संपूच नये. 
 
बराच वेळ दोन्ही मुंग्या जोडीने चालल्या होत्या. जवळ जवळ अर्धी भिंत त्यांनी पार केली होती. तुरुतुरु चालत जोडीने घालविलेल्या त्या क्षणाची  आठवण त्यांना लक्षात राहील काय, ह्या प्रश्नांचे उत्तर मी शोधत होते. मनात कुठेतरी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारे एकत्र  घालविलेल्या बऱ्याच सुखद आणि थोड्याश्या दुखःद  आठवणीत मन रंगून गेले  होते. परत जेंव्हा भिंतीवर लक्ष गेले तेंव्हा माझ्या हृदयाचा एक ठोकाच चुकल्या सारखे वाटले. जोडी जोडीने इतका वेळ एकत्र क्रमण  करणाऱ्या त्या मुंग्या आता एकमेकांपासून अलग झाल्या होत्या. स्थूल शरीराच्या मुंगीला मागे सोडून दुसरी नाजूक आणि चपळ मुंगी पुढे निघून गेली होती. असे  वाटले कि ह्या दोन मुंग्या जोडीदार नसाव्यात. बहुतेक पालक आणि तिचे अपत्य असावे. वय झाल्यावर स्थूल झालेल्या त्या मुंगीला स्वतःच्या उमेदीच्या वयात असलेल्या लेकरूच्या बरोबर चालण्याचे उसने बळ आणण्यास बहुतेक कष्ट होत असावेत. वयोमाना प्रमाणे पालकाच्या  मंदावलेल्या चालीची  अभ्रकाला जाणीव कदाचित जाणीव नसावी. पण  ह्याचा अर्थ असा नव्हें कि त्याने मागे वळून  आपल्या  पालका कडे कधी पाहूच नये. ती जाड मुंगी भरभर चालण्याचा प्रामाणिक पणे  प्रयत्न करत होती. पोटच्या गोळ्याबरोबर पावलावर पावूल टाकून मार्ग क्रमण करण्यास ती आतुर होती  आणि जीवापाड प्रयन्त ही  करीत असावी. शरीर साथ देत नसतांना सुद्धा वेड्या आशेवर पुढे पुढे जायच्या ऐवजी ती मागेच जास्त रहात होती. तिची  असहाय्य  स्थिती आणि धडपड पाहून डोळे पाणावले आणि जीवनातल्या ह्या घोर आणि क्रूर सत्याची  नकळत जाणीव झाली. ह्याच वेळेत, भर योव्वनात असलेली  ती दुसरी मुंगी जीवनाचा आनंद लुटत खूप  दूर निघून गेली होती. ना तिला वेळेच भान ना तिला स्वतःच्या पालकाची आठवण !!! आपण पण एक दिवस असेच असहाय्य स्थितीला पोहोचणार आहोत ह्याची तिला जर सुद्धा कल्पना नसावी. जाणीव जर असती तर तिने एकदा तरी मागे वळून नक्कीच पाहिले असते, नाही का? दुसरीकडे वयस्कर मुंगीच्या नशिबाने वेगळीच पलटी मारली होती. बरेच  श्रमिक प्रयन्त करून सुद्धा तिच्या पदरी अपयशच आले होते. दैवाने तिला साथ दिली नव्हती. मनात असलेल्या उमंगाना न जुमानता तिच्या पावलांनी माघार घेतली होती. भिंतीवरून कोसळून ती थेट जमिनीवर पडली होती. परत भिंतीवरचा मार्ग सामोरा घालून चालत जाण्या इतकी तिच्यात शक्ती नसावी. बराच वेळ ती तशीच निपचित होवून जमिनीवर पडली होती. तिच्या त्या दैन्यवाणी स्थितीची आणखीन थोडा वेळ निरीक्षण करत उभे राहण्याचे धैर्य माझ्यात नव्हते.मनाला झालेल्या वेदनांना लपवत तिच्या नकळत मी तेथून हळूच पाय काढता घेतला. जीवनाच्या ह्या अघोर सत्याला कोण टाळू शकेल काय ? का मग आपण उगीचच खोटी आशा उराला कवटाळून बसलेलो असतो ? ह्या जगात कुणी कुणाच नाही , हे माहित असतांना सुद्धा का आपण खोटी नाती-गोती सांभाळण्याचा खटाटोप करत असतो? ह्या प्रश्नांचे उत्तर माहित असतांना सुद्धा का ह्या जाळ्यात सर्वजण आपणहून  अडकतात ? हे सर्वकाही भगवंताच्या इच्छेनुसार होत असते का ?
 
नेहमीप्रमाणे मन अशा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतांना लक्षात आले की ती स्थूल देहाची मुंगी हळूच उठून हेलकावे खात खात पुन्हा एकदा आशेच्या जोरावर चालू लागली होती. देईल  का कुणी साथ तिला, तिच्या उरलेल्या मार्गक्रमणावर ?  

Sunday 23 June 2013

एक जोक … कि एक भेसूर सत्य !!!
 


घराजवळच असलेले "सुख-सागर" उपाहारगृह  हे आम्हा दोघांचेही आवडीचे !! शुद्ध शाकाहारी आहे म्हणून नव्हे तर पांचच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून !! वाढत्या वयोमानाप्रमाणे हल्ली भूकही बरीच कमी झाली आहे. खाण्यासाठी न जगता , जगण्यासाठी खायचे दिवस एव्हडे लवकर आमच्या जीवनात येतील याची आम्हाला तसुमात्र कल्पना नव्हती. परंतु जे झाले ते बऱ्या साठीच झाले म्हणले पहिजे. नाहीतर ह्या दुबई मध्ये बारीक आकाराची बायको ढब्बू आणि गोलाकार व्हायला एक महिन्याची पण उसंत लागत नाही .

तर अशा या सुख सागरात आम्ही काल  मजेत डुबकी मारायला गेलो होतो. थोड्याच वेळात आमच्या शेजारच्या टेबलावर एक सुंदरसा दोन हृदयं एकमेकांना चिकटून असलेला गुलाबी रंगाचा केक आणून ठेवला. तो केक बघून आमच्या मनात उगीचच गुदगुदल्या झाल्या. मी माझ्या साथीला म्हंटल ," कोणाची wedding anniversary आहे वाटते. मोठ्ठी पार्टी फेकणार असे दिसतेय ". जवळजवळ दहा - पंधरा मिनिटे तो केक तसाच उघड्यावर पडला होता . त्याच्यावर माशी किंवा झुरळ बसेल कि काय अशी मला भीती वाटत होती . मी अगदी एक चित्ताने त्याच्या वर नजर खिळवून बसले होते. अचानक वेटरनी तो केक परत डब्ब्यात भरला आणि एका माणसाच्या हातात कोंबला. हे सर्व इतके भरभर घडले कि आम्ही  दोघेही तोंड आssss करून बघत बसलो.

मी माझ्या पतीदेवाला म्हंटले,"बहुतेक त्यांचा ग्रुप मोठा असावा आणि त्यांची इथे बसायची व्यवस्था बरोबर झाली नसेल. ते दुसरी कडे कुठे तरी गेले असतील." ह्यावर माझ्या हजरजवाबी नवऱ्याने काढलेले उद्गार अगदी कौतुक करण्यासारखे आहेत. ते म्हणाले ," नाही तसे काही झाले नसेल. मला वाटते, केक कापण्याच्या अगोदरच त्या दोघांचा घटस्फोट  झाला असण्याची जास्त शक्यता आहे. हल्ली नाती बनवायला आणि मोडायला पाच मिनिटे सुद्धा लागत नाहीत. काळाच्या ओघात सगळेच बदलत आहे." त्यांचे हे  विश्लेषण ऐकून मन सूंद झाले.

खरंच, किती भेसूर सत्य त्या वाक्यात लपलेले होते. नाती जपण्यात जी एकप्रकारची मनाची मृदुलता , सहिष्णुता,  अध्वरता लागते ती हल्ली कुठे हरवून गेली आहे कोणास ठावूक ? प्रत्येक जण आपलेच खरे आणि श्रेष्ठ म्हणतो . Compatibilityच्या नावाखाली अगदी मनाला येईल तसे वागण्याचा प्रयन्त हल्लीची पिढी करत आहे. "मी आणि माझे" ह्या पलीकडे कोणाला काही दिसेनासेच झाले आहे. अशा ह्या जगात भगवंताच्या अनुसंधानात राहुन परमार्थ करण्याची रीत तर आता स्वप्नात सुद्धा जमणार नाही. कुठले प्रेम, कुठली आपुलकी, कुठला दिलासा, कोण कुणाचा …संपूर्ण घडीच बिघडली आहे. हातात काठी धरून जीवन समाधानाने जगू म्हणणाऱ्याच्या नशिबात आता हात पण परका झाला आहे आणि काठीचा तर कुठे सुगावाच लागत नाही आहे…. काय हा परकेपणा !!!!     

Monday 3 June 2013

सत्संगती 


श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||
न लगे जावया | कुठे पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||
व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||
अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||
लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांत मिळून मिसळून राहणे. श्रेष्ठ लोकांच्या सहवासात असणार्‍या व्यक्तीमध्ये चांगले गुण येतात व ते विकसित होतात. आपल्यापेक्षा अधिक योग्य, गुणी, बुद्धिमान विद्वानांच्या सहवासाला सत्संगती म्हणतात.याउलट अयोग्य, गुणहीन,मूर्ख व्यक्तीचा सहवास म्हणजेच कुसंगती होय. सभोवतालच्या वातावरणातून मनुष्य बरेच काही शिकतो. जर त्याला चांगली संगत मिळाली तर त्याचा निरंतर विकास होत राहतो. विनोभा भावे म्हणतात, 

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥

अशीच सत्संगती मला, देवाच्या कृपेने, गेले ५ वर्षे अगदी सतत आणि प्रकर्षाने मिळाली आहे. जीवनाच्या साथीदाराबरोबर अगदी मनापसून उत्तेजित होवून, उल्हासाने, स्थिरतेने, समाधानाने, आनंदाने घालविलेली ही ५ वर्षे माझ्या नशिबात आली आणि मी ती पूर्णपणे चोखंदळू शकले, हे देवाच्या कृपेशिवाय आणि थोरामोठ्यांच्या  आशीर्वादाशिवाय कसे साध्य होईल ? दररोज किमान एक तास तरी काहीतरी चांगले  वाचण्याचा परिपाठ आम्ही एकत्र गेली पाच वर्षे करत आहोत. पुढे पण हा परिपाठ चालू ठेवण्यास देव आम्हाला समतोल बुद्धी देवो, अशी देवाकडे प्रार्थना !!!

दररोज संध्याकाळी, "THE HOLY GEETA" by स्वामी चिन्मयानंद , श्री. प्र. ह. कुलकर्णी यांचे  "मनोबोधामृत" , साने गुरुजींचे "श्यामची आई ", श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची "प्रवचने" ह्या अशा सुलभ सुंदर, सहज आकलन होण्याऱ्या दिव्य पुस्तकांचे वाचन आणि सोबतीला माझ्याशी एकरस होवून वाचलेले ऐकणारा आणि ऐकाविणारा असा माझा थोर साथीदार …… सत्संगतीचा अर्थ ह्याशिवाय वेगळा काय बरे असू शकेल?